संबंधित नागरिकांनी बैठकामध्ये सक्रिय सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
पंढरपूर :– नुकत्याच झालेल्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यानंतर पंढरपूर मध्ये होणाऱ्या कॉरिडॉरच्या चर्चेने वेग घेतला आहे. शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी कॉरिडॉर संदर्भात बैठक घेतली. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. त्यानंतर या प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. प्रकल्प बाधितांशी चर्चा करण्यासाठी 3 उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता कॉरिडॉरला लवकरच मुहूर्त लागणार असल्याचे बोलले जात आहे.
पंढरपूर कॉरिडॉर विकासाच्या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी तसेच शासनाकडून कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे याची माहिती देण्यासाठी दिनांक 25 जुलै ते 5 ऑगस्ट 2025 या कालावधीत बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. या बैठका घेण्यासाठी तीन उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून सर्व समावेशक चर्चा होण्यासाठी नागरिकांनी सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, भूसंपादन अधिकारी सीमा होळकर व जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे या तीन उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती पंढरपूर कॉरिडॉर अनुषंगाने संबंधित नागरिकांशी सर्व समावेशक चर्चा करून नागरिकांच्या मागण्या सूचना व अपेक्षा यांची माहिती जाणून घेणार आहे तसेच शासन त्यांना या अंतर्गत कशा पद्धतीने मदत करू शकते याविषयी सांगितले जाणार आहे.
संबंधित अधिकारी दररोज 25 ते 30 नागरिकांच्या गटाशी चर्चा करतील. तरी पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत ज्या नागरिक, व्यापारी व व्यावसयिक यांचा संबंध येणार आहे अशा सर्व नागरिकांनी अशा बैठकामध्ये उपस्थित राहून सहकार्य करावे. नियुक्त केलेले अधिकारी हे उपरोक्त कालावधीत पंढरपूर येथे थांबून कामकाज करतील.
” पंढरपूर कॉरिडॉरच्या अनुषंगाने दिनांक 1 ते 3 मे 2025 या कालावधीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथे सर्व संबंधित नागरिकांच्या बैठका घेऊन चर्चा केलेली होती व त्या चर्चेमध्ये या अनुषंगाने पुढे जाण्यासाठी सर्वांना विचारात घेऊनच जाऊ असा शब्द प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला होता. त्या पार्श्वभूमीवर दिनांक 25 जुलै ते 5 ऑगस्ट 2025 या कालावधीत नियुक्त केलेले तीन उपजिल्हाधिकारी 25 ते 30 नागरिकांच्या गटाशी चर्चा करणार आहेत. या चर्चेतून सर्वसमावेशक निर्णय घेण्यात येणार आहे. तरी उपरोक्त कालावधीत सर्व संबंधित नागरिकांनी बैठकामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन करतो.”
– श्री. कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी, सोलापूर
